उस्मानाबाद येथे शासकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालय उभारणीला तत्वतः मान्यता
पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश
मुंबई प्रतिनिधी : २७ ऑगस्ट २० :
उस्मानाबाद येथे शासकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालय उभारणीला तत्वतः मान्यता देण्यात आली असून, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले आहे.
गुरुवार दि. २६ ऑगस्ट रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह उस्मानाबाद येथे नव्याने उभारावयाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाच्या संदर्भाने आढावा बैठक झाली. या बैठकीस पर्यावरण तथा राज्य शिष्टाचार मंत्री ना. आदित्य ठाकरे, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील आदी उपस्थित होते
उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत गुरूवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली हे महाविदयालय सुरू करण्याच्या दृष्टीने सर्वेष चर्चा झाली. या संदर्भातील कार्यवाहीचा आढावा घेणेत येऊन वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तत्वतः मान्यता देण्यात आली. आता यापूढील कार्यवाही वैदयकीय शिक्षण विभागाने तातडीने पुर्ण करावी अशा सुचना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी संबंधितांना यावेळी दिल्या आहेत. या बैठकीच्या दरम्यानच उस्मानाबाद जिल्हयातील कोवीड१९ प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासना मार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला. सध्या कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांची कमतरता जाणवत आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी जिल्ह्यातील सामान्य जनता आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अन्य जिल्ह्यातून तात्पुरत्या स्वरूपात उधार उसनवार तत्वावर ते उपलब्ध करून देण्याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांना निर्देश देण्यात आले आहेत.
———————
लातूर जिल्ह्यात तुती लागवडीतून रेशीम उत्पादनाला प्रोत्साहन द्या पालकमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई प्रतिनिधी : २७ ऑगस्ट २० :
लातूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तुती लागवड करण्यास उत्सुक आहेत या शेतकऱ्यांना एकत्र करून जिल्ह्यात तुती लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
अलीकडेच नागपूर येथील रेशीम संचालनालयाकडून महारेशिम अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या अभियानात लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात उत्सुकता दाखवली होती. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना त्याचप्रमाणे मनरेगा या दोन योजनांच्या माध्यमातून तुती लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. मनरेगाच्या माध्यमातून तुती लागवडीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाते. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत तुती लागवडीसाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या सर्व अनुकूल गोष्टींचा फायदा घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे आणि रेशीम उत्पादनात लातूर जिल्ह्याला आघाडीचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
———————————–
Leave A Comment